सावंतवाडी : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात होत आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्कारक्षम व कौशल्यधिष्ठित अशा अभ्यासक्रमाची रचना करण्यात येत आहे. नव्या बदलाचा विद्यार्थी, पालक, शिक्षक सक्षमपणे सामोरे जाऊन नव्या बदलाचा स्वीकार करावा. परीक्षेतील यश आयुष्याला वळण लावणारे व व्यक्तिमत्त्व खुलविणारे असेच आहे. सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्व कौतुकास पात्र आहेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना केले.
नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ऑनलाईन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिक्षणमंत्री केसरकर हे प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. मात्र त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले होते. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, केसरकर मित्रमंडळाचे राजन पोकळे, शिक्षणमंत्री केसरकर यांचे स्विय सहाय्यक रामचन्द्र आंगणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, शिवसेना जिल्हा महिला संघटनेच्या ॲड. नीता सावंत, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, सौ. भारती मोरे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, राष्ट्रीय शिक्षण धोरण समिती सदस्य तथा मराठी अध्यापक संघ अध्यक्ष भरत गावडे, राष्ट्रीय शिक्षण धोरण समिती सदस्या प्रा. सुषमा मांजरेकर, शिक्षक संघटनेचे म. ल. देसाई, आबा केसरकर, नंदू शिरोडकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी पानवेकर म्हणाले, दहावी, बारावी त तुम्ही चांगले गुण संपादन केलात पण यापुढे तुमचा खरा कस आहे. जिद्द व मेहेनतीतून तुमचे ध्येय गाठा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
शिक्षणाधिकारी चौगुले म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवत्तेची चर्चा राज्यात होते. येथील विद्यार्थ्यांमध्ये ठासून गुणवत्ता भरली आहे . अशा या सत्करातून गुणवंतांना अधिक प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल, असे चौगुले म्हणाले. प्राथमिक शिक्षणाधिकारी कुडाळकर यांनीही विध्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा केसरकर मित्रमंडळाचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आंगणे यांनी शिक्षणमंत्री केसरकर यांच्या शुभ संदेशचे वाचन केले.
यावेळी तालुक्यातील शाळा मधून दहावी, बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विध्यार्थि, शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थि,१०० , टक्के लागलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, विशेष यश संपादन केलेले विद्यार्थी, निवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. स्वरांगी खानोलकर, राष्ट्रीय शिक्षण धोरण समितिवर निवड झालेले भरत गावडे, प्रा. सुषमा मांजरेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दादा माडकइकर यांच्या बहारदार काव्य गायनही यावेळी झाले. ३०० हून अधिक गुणवंतांचा यावेळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत गावडे यांनी केले. तर सूत्रसंचालन विशाखा पालव, प्रा. सुषमा मांजरेकर व सौ. पंडित यांनी केले.